शिरूर: अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे खून प्रकरणात एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी हा गव्हाणे याच्या घरी जाऊन सापडले का आरोपी? अशी विचारणा करत असे. तर दुसऱ्या आरोपीचे वडील हे आरोपीला केवळ फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे मीडिया समोर बोलत होते.
दरम्यान, गुरुवारी (६ मार्च) दाणेवाडी येथे माऊली गव्हाणे या युवकाचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याचे धड, दोन हात आणि पाय कटरच्या साह्याने कापून वेगवेगळ्या विहिरीमध्ये फेकण्यात आले होते. अहिल्यानगर पोलिसांसमोर या खुनाचा शोध लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. याप्रकरणी विविध तर्कवितर्क लावले जात होते. या खुनाचा छडा कधी लागेल? याची वाट शिरूरसह श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक पाहत होते.
सहा मार्चला रात्री साडे अकरा वाजता माऊली गव्हाणे घरातून बाहेर पडला होता. यानंतर तो घरी परत न आल्याने कुटुंबातील सर्वजण चिंताग्रस्त होते. दरम्यान शनिवारी (८ मार्च) माऊली त्याच्या चुलत बहिणीला शिरूर येथील बोरा महाविद्यालयाजवळ दिसला होता, असे तिने कुटुंबाला सांगितले होते. यानंतर माऊली गव्हाणे याच्या कुटुंबाकडून पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर बुधवारी (१२ मार्च) दाणेवाडी येथील एका विहिरीमध्ये एक शीर, दोन हात व एक पाय नसलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह आपल्या मुलाचा तर नाही? या संशयाने माऊली याचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी शिरूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. हा मृतदेह कोणाचा? तसेच माऊलीच्या हरवल्याच्या तक्रारीवर आतापर्यंत काय ॲक्शन घेण्यात आली? याबाबत विचारणा केली होती. यावेळी शिरूर पोलिसांनी २४ तासांमध्ये तक्रारी संदर्भात तपास कर, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर शरीराचे तुकडे केलेला मृतदेह आढळून आल्यानंतर श्रीगोंदा आणि अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तपासासंदर्भात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला. माऊली गव्हाणे घरातून बाहेर पडल्यापासूनची माहिती गावातील ग्रामस्थ तसेच माऊलीच्या कुटुंबियांना भेटून घेण्यात येत होती. दरम्यान शनिवारी १५ मार्च रोजी दुसऱ्या विहिरीत मृतदेहाचे शीर, दोन हात आणि एक पाय असे अवयव सापडले. शरीराचे हे अवयव पाहून हा मृतदेह माऊली गव्हाणेचा असल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते. यानंतर दाणेवाडी ग्रामस्थ सतत आरोपी सापडला का? याची विचारणा माऊलीच्या कुटुंबीयांकडे करत होते.
अशी विचारणा करणाऱ्यांमध्ये माऊलीच्या मित्रांचा देखील समावेश होता. याच मित्रांपैकी एक दाणेवाडी येथील सागर गव्हाणे हा होता. सागरने माऊलीचा खून केला असेल, असे त्यावेळेस कोणाला वाटलेही नसेल. दाणेवाडी येथीलच माऊलीचे दोन मित्र आरोपी असल्याचे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात निष्पन्न झाले. यामध्ये सागर गव्हाणे याचादेखील समावेश होता. त्यानंतर सागर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच एका मित्राच्या सहाय्याने माऊलीचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
तर दुसरीकडे सागर याच्या साथीदाराचे वडील हे या घटनेने व्यथित झाले होते. आरोपी निष्पन्न होण्याआधी मीडियाशी बोलताना, त्यांनी जे कोणी आरोपी असतील, त्यांना फाशी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. परंतु, या खुनामध्ये आपलाच मुलगा सहभागी असेल, असा विचार त्यांच्या मनात देखील आला नसेल. मात्र, ज्यावेळी त्यांना समजले आपलाच मुलगा या गुन्ह्यात आरोपी आहे, त्यावेळी त्यांच्यावर मोठे आभाळ कोसळले. सागर गव्हाणे आणि दुसरा अल्पवयीन आरोपी यांच्याशी माऊली गव्हाणे याची चांगली मैत्री होती. मात्र, केवळ आपले समलैंगिक संबंध माऊली हा समाजासमोर उघड करेल, या भीतीने या आरोपींनी माऊलीचा खून केला.