पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: रायगड किल्ल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे सरकारने तातडीने संवर्धन करायला हवे, असे मत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केले. रांजणगाव गणपती, ता.शिरुर येथे लोकसहभागातून उभारलेल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्याचे अनावरण संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याला अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, लोकनियुक्त सरपंच सुवर्णा वायदंडे, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, निर्मलग्राम ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, शिवशाही प्रतिष्ठानचे सदस्य, असंख्य कार्यकर्ते, शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजी राजे छत्रपती पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचायला हवेत. शिवाजी महाराजांनी कशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य हे सुराज्य कसं होईल हा दृष्टिकोन समोर ठेवला. शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचे संवर्धन कसं करता येईल याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. त्यासाठी दीर्घकालीन नियोजन होणे गरजेचे आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरण स्थापन होऊन काम सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांचेही संवर्धन सरकार कडून होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळ्यानिमित्त पुजा होम हवन, श्रींच्या मूर्तीचा महाभिषेक, श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना, उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक, श्रींची माहिती सांगणारे पोवाडे, गाणी पालखीतून ढोल ताशे हलगी वादन, श्रींचा पोवाडा व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे भव्य लोकार्पण संपन्न झाले.
येथील शिवशाही प्रतिष्ठानच्या पुढाकाराने रांजणगाव गणपती ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून उभारलेल्या या सिंहासनाधिष्टीत शिवछत्रपतींच्या शिवस्मारकामुळे गावच्या वैभवात मोठी भर पडणार असून, यामुळे शिवप्रेमी तरुण व ग्रामस्थांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे.