जेजुरी : पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाटा जवळ एस.टी.बस व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रमेश किसन मेमाणे (वय-६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय-४०) व पांडुरंग दामोदर मेमाणे (वय-६५, तिघेही बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे, ता. पुरंदर जि. पुणे) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सासवड जेजुरी रस्त्यावर (पालखी महामार्ग) बेलसर फाटा परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. दुचाकीवर असणारे तिघे जण रस्ता क्रॉस करून जात होते. त्यावेळी एसटीबसने या तिघांना जोरदार धडक दिली. दरम्यान, एसटी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा खूप प्रयत्न केला.
मात्र, दुचाकी बस खाली गेल्याने दुचाकीला लांबपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे या अपघातात दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांना तातडीने जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकाच वस्तीवरील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे गावावर शोककळा पसरली आहे.