सोमाटणे दि.20: शासनाला राज्यात आणखी धनंजय नागरगोजे व्हावे असे वाटत आहे काय. असा सवाल मावळ तालुक्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी केला आहे. या शिक्षकांच्या वेतनाचा शासन निर्णय होवूनही त्याची अमलबजावणी होत नाही. प्रत्येक अधिवेशनात त्यांना नवीन कारण सांगून टाळले जात आहे. त्यामुळे राज्यात आणखी शिक्षकांच्या आत्महत्या व्हाव्यात असे शासनाला वाटत आहे. असा टाहो मावळातील या शिक्षकांनी फोडला आहे.
मावळ तालुक्यातही काही 20,40,60 टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा आहेत. या शाळांना त्यांचा वाढीव अनुदानाचा पुढील टप्पा शासनाने मान्य केला आहे. असा निर्णयही शासनाने 14 ऑक्टोबर 2024 रोजी घेतला आहे. परंतु अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने हे शिक्षक हवालदिल झाले आहेत. त्यातच बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाने गळफास घेवून स्वतःची जीवनयात्रा संपवली. याचा अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी उद्रेक होत असून याचा शासनास जाब विचारत आहेत.
डी.एड, बी.एड करून तुटपुंज्या पगारावर खासगी शिक्षण संस्थेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची पिढी घडवत आहेत. आज ना उद्या वेतन वाढ होईल, या भोळ्या भाबड्या आशेवर शिक्षक अनुदानित माध्यमिक विद्यालयात मुलांना शिकविण्याचे प्रामाणिक काम गेले 15 ते 20 वर्षापासून करत आहेत. कधी ना कधी तरी आपल्याला पूर्ण पगार मिळणार, या अपेक्षेवर ते आज आपल्या संसाराचा गाडा तोकड्या पगारावर चालवत आहेत. काही शिक्षक शाळा सुटल्यावर वॉचमन, रात्रपाळी करून संसाराचा गाडा चालवत आहेत आणि अचानक नैराश्या आलं तर स्वतःला संपवत आहेत.
बाकीच्या गोष्टीला यांच्याकडे पैसे आहेत मग आम्हीच काय घोडं मारलं आहे? असा सवाल हे शिक्षक करत आहेत. वेतनवाढ होत नसल्याने काही शिक्षक हे आत्महत्या करत आहेत तर काहींचा हृदयविकाराने मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच बीड येथिल हा धक्कादायक प्रकार घडला. धनंजय नागरगोजे या शिक्षकाने संस्थाचालक याच्या त्रासास कंटाळून पगार होत नसल्याने जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्यासह सबंध राज्यात मोठ्या प्रमाणावर दुख व्यक्त केले जात आहे.
गेल्या पंधरा वीस वर्षांपासून अंशतः वेतनावर कुठे विनावेतन हे शिक्षक काम करत आहेत. यांच्या वेतनाचा निर्णय करूनही शासन या निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत. आजपर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपल्या जीवनयात्रा संपवल्या आहेत. काहींना हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला आहे. शासनाला राज्यात आणखी नागरगोजे घडू नयेत असे वाटत असेल तर त्यांच्या वेतनाच्या झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व या शिक्षकांचा मानसिक छळ थांबवावा.
-रमेश फरताडे (अंशतः अनुदानित मुख्याध्यापक शिरगाव)