पुरंदर, ता. 27 : “सध्या संपूर्ण जग तापमानवाढीच्या दुष्परिणामांना सामोरे जात आहे. यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते, जलस्रोतांचे संवर्धन होते आणि नैसर्गिक समतोल टिकून राहतो. केवळ वृक्ष लावणेच नव्हे तर त्यांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.” असे प्रतिपादन जॉन्सस कंट्रोल इंडिया प्रा. लि. चे उपाध्यक्ष शिवकुमार सेल्वा यांनी केले.
जागतिक वनदिन व जागतिक जलदिनाचे औचित्य साधून जॉन्सस कंट्रोल इंडिया प्रा. लि. व भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुडीत (ता. पुरंदर) येथे 1250 देशी वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली. या उपक्रमात बोलताना शिवकुमार सेल्वा यांनी हि माहिती दिली.
यावेळी मनिष जेठवानी, प्रसन्न बारी, वर्तिका जिंदाल, सौम्यला नाझली, संतोष चिखले, नितीन राऊत, मोहन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेच्या वतीने प्रकाश जगताप, दत्तात्रय लोंढे, अक्षय राऊत, जयेश खन्ना, शेखर मरकड यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिवकुमार सेल्वा म्हणाले, “हरितवायूंच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढत आहे. झाडे कार्बनडायऑक्साईड शोषून घेऊन पर्यावरणाचे रक्षण करतात. एक एकर क्षेत्रातील झाडे एका कारने 26 हजार किलोमीटर धावताना उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपणाला प्राधान्य द्यावे.”
दरम्यान, कार्यक्रमात भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी वृक्षलागवडीच्या शास्त्रीय पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी झाडांमुळे होणाऱ्या फायद्यांवरही प्रकाश टाकला. “झाडांमुळे हवेची गुणवत्ता सुधारते, तापमान घटते, जलप्रदूषण कमी होते आणि जमिनीची धूप थांबते. तसेच वन्यजीवांना सावली आणि पाण्याची सोय होते,”वृक्षलागवडीसारख्या उपक्रमांमुळे पर्यावरण संतुलन साधले जाईल आणि भविष्यासाठी स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध होईल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.