दिल्ली : महाकुंभमेळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीला आधी महाकुंभात संगम नदीवर स्नान करायला नेलं आणि तीची चाकूने हत्या केली. त्यानंतर कुटुंबाला आणि पोलिसांना सांगितलं की, पत्नी महाकुंभाच्या गर्दीत हरवली आहे. पोलिसांनी तपास केला असता, पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक हा दिल्ली महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो दिल्लीतील त्रिलोकपुरीचा रहिवासी आहे. डीसीपी अभिषेक भारती यांनी सांगितले की, आरोपीचे विवाहबाह्य संबंध होते. आरोपी पती गेल्या ३ महिन्यांपासून त्याची पत्नी मीनाक्षीच्या हत्येचा कट रचत होता.
हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
डीसीपी अभिषेक भारती म्हणाले की, आरोपी आणि त्याची पत्नी १८ फेब्रुवारीला प्रयागराजला गेले होते. संगमात दोघांनी स्नान केलं, नंतर न्यु झुसी परिसरात एक खोली भाड्यानं घेण्यात आली. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. हाच राग धरून त्यानं पत्नीची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर झुसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
याबाबत २१ फेब्रुवारीला मृत महिलेचा भाऊ आणि तिच्या मुलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कपडे आणि छायाचित्रांवरून महिलेची ओळख पटली. पोलिसांना कुटुंबातील सदस्यांकडून माहिती मिळाली की पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. आरोपीने पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याने पत्नीची हत्या केली असल्याचं कबुल केलं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.