बद्रीनाथ: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १० कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा हे सर्व कामगार बद्रीनाथ धाममध्ये रस्ता बांधकामाच्या कामात गुंतले होते. चमोली जिल्हा पोलिस-प्रशासन अधिकारी आणि बीआरओ टीमचे सदस्य घटनास्थळी उपस्थित आहेत.
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हे लक्षात घेता, बद्रीनाथ धामपासून तीन किलोमीटर पुढे असलेल्या माना गावाजवळ रस्त्यावरील बर्फ काढून त्याची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शुक्रवारी सकाळीही एका खाजगी कंत्राटदाराचे ५७ कामगार रस्त्यावरून बर्फ काढत होते, तेव्हा अचानक हिमस्खल झाल्यामुळे सर्व कामगार बर्फाखाली गाडले गेले.
या अपघाताची माहिती मिळताच सीमा रस्ते संघटना (BRO) आणि जिल्हा पोलिस-प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. बर्फाखाली गाडलेल्या १० कामगारांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले, तर इतरांचा शोध सुरू आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन कमांडर अंकुर महाजन यांनी सांगितले की, माना गावाच्या सुमारे एक किलोमीटर आधी आर्मी कॅम्पजवळील रस्त्यावर हा अपघात झाला.
आम्हाला सकाळी ८:०० वाजता टेकडीवरून हिमस्खलन झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आल्याचे अंकुर महाजन यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी कंत्राटदाराचे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले आहेत. हे सर्व कामगार तिथे एका छावणीत राहत होते, त्यामुळे ते अपघाताचे बळी ठरले.
यावेळी बद्रीनाथ धाममध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी, रस्त्यांवरील बर्फ काढून टाकला जात आहे. बीआरओ कमांडर अंकुर महाजन म्हणाले की, बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यात अडचण येत आहे. तरीही आमची टीम बर्फातून कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.