मुंबई : नव्या सरकारचे दुसरे अधिवेशन पार पडले. पण विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच नाही. भास्करराव जाधवांनी जंग जंग पछाडले, जयंतरावांनी मन वळवण्याचा प्रयत्न करुन पाहिला, नानांनी गमंतीगंमतीत विषय काढून पाहिला. पण सत्ताधाऱ्यांना काही पाझर फुटलाच नाही. विरोधी पक्षनेत्याची खुर्ची आणखी काही काळ मोकळी राहणार, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना देऊन टाकले.
महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले. दोन दोन अधिवेशनांचे सूप वाजले. विधानपरिषदेला नवे सभापती मिळाले. विधानसभेलाही नवे उपाध्यक्ष मिळाले. पण विरोधक ज्याकडे डोळे लावून बसले होते ते विरोधी पक्षनेतेपद रितेच राहिले. यावरून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांची खंत आणि सरकारची तितकीच थंड भूमिका समोर आली. किमान अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी सरकारने विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय घ्यावा, यासाठी विरोधक आग्रही होते. सरकारलाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचे नाही, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.