मुंबई : राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठीचे १०० युनिटपर्यंतचे वीज दर प्रति युनिट ७.६५ रुपयांवरून ५.८७ रुपयांपर्यंत म्हणजेच १ रुपया ७८ पैशांपर्यंत (२३ टक्क्यांनी) तर १०१ ते ३०० युनिट वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांचे दर सरासरी प्रति युनिट १३.४९ रुपयांवरून ११.८२ पर्यंत म्हणजेच १ रुपया ६७ पैशांपर्यंत (१२ टक्क्यांनी) कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवल्याची माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक व भाजप प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी दिली.
१ एप्रिलपासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जा निर्मितीच्या धडाकेबाज कार्यक्रमामुळेच शेतकरी, घरगुती व औद्योगिक ग्राहकांचा फायदा होणार असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले. प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाठक बोलत होते.
यावेळी पक्षाचे माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. पाठक म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे राज्यात आगामी २ वर्षांत १६ हजार मेगावॅट एवढी सौर वीज निर्मिती होणार आहे. त्याचा मोठा फायदा महावितरणला होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून त्याचा घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे आगामी ५ वर्षांत १०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५.८७ रु प्रति युनिटपर्यंत, तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११.८२ रु. प्रति युनिटपर्यंत टप्याटप्प्याने कमी होतील.
औद्योगिक ग्राहकांसाठीच्या सर्व सवलत, प्रोत्साहन योजना चालू ठेवण्यात येतील, तसेच औद्योगिक ग्राहकांना क्रॉस सबसिडी देण्याची गरज पडणार नसल्याचे पाठक यांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे अनेक फायदे पुढील ५ वर्षांत ग्राहक आणि महावितरणला होणार आहेत. महावितरणचा सरासरी वीजपुरवठ्याचा दर सध्याच्या ९.४५ रुपये दरावरून २०२९-३० पर्यंत ९.१४ रुपयांपर्यंत खाली येणार आहे, असेही पाठक यांनी स्पष्ट केले.