मुंबई: विधान परिषदेचे पाच सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या तीन, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एक अशा पाच सदस्यांच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी ही निवडणूक जाहीर झाली असून 10 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने विधान परिषदेचे सदस्य असलेल्या आमशा पाडवी, गोपीचंद पडळकर, राजेश विटेकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. आमशा पाडवी-अक्कलकुवा, गोपीचंद पडळकर-जत, राजेश विटेकर-पाथरी, प्रवीण दटके नागपूर मध्य आणि रमेश कराड हे लातूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 10 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 मार्च आहे. 18 मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 20 मार्च ही अंतिम मुदत आहे. 27 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.