मुंबई: संजय गांधी निराधार योजनेमध्ये काही निवृत्तीवेतन घेणारे आणि मोठे शेतकरी यांचा समावेश असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणूण देण्यात आली आहे. अशा प्रकारे बोगस लाभार्थ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ बोलत होते.
संजय गांधी निराधार योजनेमध्ये अशाप्रकारे बोगस लाभार्थी असणे ही गंभीर बाब असल्याचे सांगून विशेष सहाय्य मंत्री झिरवाळ म्हणाले की, याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच यामध्ये अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल. ही योजना गरीब व गरजू लोकांसाठी आहे त्यामध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून या योजनेचे अनुदान आता डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लाभार्थ्याचे आधार सलग्न बँक खाते आणि केवायसी असणे आवश्यक आहे. 38 लाख 11 हजार 137 डीबीटी पोर्टल वर नोंदणी झालेले लाभार्थी आहेत तर 30 लाख 30 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. आधार लिंक झाल्यानंतर सर्व निधी वितरीत करण्यात येणार आसल्याचेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.