मुंबई: महाराष्ट्रासह देशभरातील सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढत असतानाच गेल्या सहा वर्षांत नागरिकांनी सायबर फसवणुकीत गमावलेल्या रमकेतील सुमारे ६५० कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टल आणि सायबर हेल्पलाईन १९३० आणि १९४५ या माध्यमातून ही कारवाई केली आहे. तसेच सायबर पोलिसांनी या हेल्पलाईनच्या माध्यमातून ५० जणांचे जीव वाचवल्याचे सायबर विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी सांगितले.
सायबर ठगांकडून वेगवेगळी प्रलोभने दाखवून, भूलथापा घालून तसेच भीती घालून सामान्य नागरिकांसह उच्च प्रतिष्ठित व्यक्तींना गंडा घातला जात आहे. या गुन्ह्यांची उकल करून यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचा एक भाग म्हणून नवी मुंबईत एक अत्याधुनिक सायबर मुख्यालय स्थापन करण्यात आले आहे. येथे १०० हून अधिक अनुभवी सायबर विश्लेषक कार्यरत आहेत. या केंद्रात डायल १९३० आणि डायल १९४५ या दोन हेल्पलाइनच्या माध्यमातून सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांची पोलीस मदत करत आहेत.
सायबर हेल्पलाइनला गेल्या वर्षी १५ ऑक्टोबरपासून ९ लाख कॉल्स आले आहेत. तर, २०१९ पासून महाराष्ट्र सायबरने सुमारे साडेचार लाख फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गमावलेल्या रकमेतील ६५० कोटी रुपये वाचवले आहेत. पोलिसांनी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलच्या माध्यमातून १६६ कोटींहून अधिक आणि सायबर हेल्पलाईन १९३० आणि १९४५ या माध्यमातून ४६४ हून अधिकची रक्कम वाचवली आहे.