पंजाब : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसल्यानंतर आता पंजाबमध्येही मोठे राजकीय बदल होण्याची चिन्हे आहेत. भाजपने राज्यात आपले बळ वाढवण्यासाठी तयारी सुरू केली असून, विरोधी पक्षांतील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून ऐन होळीच्या काळातच पंजाबमध्ये राजकीय धुळवड रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि पंजाबचे प्रभारी विजय रूपाणी तसेच प्रदेश संघटन मंत्री मंथरी श्रीनिवासलु यांनी पक्षबांधणीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी काही काळापूर्वी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु असल्याने, नेतृत्वाची रिकामी जागा भरण्यासाठी भाजप नवा फॉर्म्युला आखत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील गटबाजी टाळण्यासाठी आणि भाजपच्या प्रभावाला चालना देण्यासाठी केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्यासोबत रूपाणी आणि श्रीनिवासलु यांच्या चांगल्या समन्वयाचा फायदा पक्षाला होत आहे.
दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाच्या नेतृत्वासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पंजाबमध्येही पक्षातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. भाजपच्या गुप्त हालचालींमुळे आपच्या काही आमदारांनी पक्ष सोडण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. काही काँग्रेस नेतेही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे कळते.
गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपचा मतवाटपाचा टक्का कमी होता, मात्र आता पक्षाने मोठी झेप घेतल्याचा दावा केला जात आहे. सहा टक्क्यांपर्यंत घसरलेले मतवाटप आता 18 टक्क्यांवर पोहोचल्याचा भाजपचा दावा आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या दिशेने भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत.
भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आम आदमी पक्षाने आता नव्या रणनीतीवर भर दिला आहे. पंजाबमध्ये ड्रग माफियांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली असून, दिल्ली सरकारप्रमाणेच येथेही बुलडोझर अॅक्शन घेतली जात आहे. यावरून स्पष्ट होते की, आपने भाजपप्रणीत राज्यांची रणनीती स्वीकारली आहे.
पंजाबमध्ये भाजप आपली ताकद वाढवेल की आम आदमी पक्ष आपले वर्चस्व टिकवेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे आणि आगामी निवडणुकांपूर्वी आणखी मोठे बदल होण्याची शक्यता आहे.