पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 1 तर अपक्षाने 1 अर्ज दाखल केला होता. मात्र आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.या पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने बाद झाला आहे .
या निवडणुकीसाठी भाजपकडून दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान अपक्ष उमेदवाराने दाखल केलेला अर्ज बाद झाल्याने विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळत आहे. 20 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून 20 तारखेनंतर बिनविरोध संदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी करणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड येथील उमेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भरलेल्या अर्जासोबत अनुमोदक आणि सूचक म्हणून एकही आमदाराची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. या पोटनिवडणुकीत सहापैकी पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तर या अपक्ष आमदारांनी भरलेला अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.