पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात येईल असा आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला आहे.
महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील तहसीलदार ते निवड श्रेणीतील अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक यांच्या अधिनस्थ काही अधिकारी वारंवार विनापरवानगी मुख्यालयात गैरहजर राहत असल्याचे आढळून आले. यासंदर्भात मंत्री बावनकुळे यांच्याकडे आलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यावर त्यात तथ्य आढळून आल्याने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महसूल विभागाच्या बैठका किंवा आकस्मित परिस्थितीत प्रशासनास अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. काही वेळेस अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने सर्वसामान्यांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे आता जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.