पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे.हे अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागून आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधक विविध मुद्द्यावरून घेरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिक गाजण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारला विरोधक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण,स्वारगेट बलात्कार घटना,मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, अपात्र बहिणींच्यां मुद्द्यावरून घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे. तीन पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करतानाही दिसून आले. अशा परिस्थितीत उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधकांची एकजूट राहणार की नाही?याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान अधिवेशनाच्या आधीच आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबदास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी अंबादास दानवे यांनी विविध मुद्द्यावरून महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान अधिवेशनापूर्वी आज सत्ताधाऱ्यांकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे,मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. आता उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांची विविध मुद्द्यावरून कोंडी करणार आहेत.