पुणे : महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर ते चौकदरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.यासाठी केंद्र सरकारने तब्बल ४५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा नवीन कॉरिडॉर पागोटे गावाजवळील जेएनपीए बंदरापासून सुरू होईल आणि मुंबई-पुणे महामार्गावर संपणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवाशांना जेएनपीटीवर पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे दोन ते तीन तासाचा अवधी लागतो. मात्र केंद्र सरकारच्या या मंजुरीमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार असून जेएनपीटीला जोडल्या जाणाऱ्या या नव्या मार्गाला पागोटे येथून सुरुवात होणार आहे.हा महामार्ग सहा पदरी असणार आहे.हा नवीन कॉरिडॉर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर ते चौकदरम्यान नवीन ६ लेन ग्रीन फील्ड प्रोजेक्ट कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. हा प्रोजेक्ट बीओटी या तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. यासाठी तब्बल ४५००.६२ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. हा एवढा खर्च केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.