बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडसह राज्यभरात संतापाची लाट उसळली. या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 126 दिवसापासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र त्याचा अजूनही थांगपत्ता लागला नाही. अशातच आता त्याच्या तपासासाठी एसआयटीने मोठा निर्णय घेत पथकात नवे दोन कर्मचारी वाढवले आहेत.
फरार कृष्णा आंधळेच्या शोधासाठी केजमधील स्थानिक कर्मचारी पथकात समाविष्ट आहे, याबाबत गृहविभागाने आदेश काढले आहेत. त्यानुसार राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या महासंचालकांनी या पथकात एक पोलिस हवलदार आणि एक पोलीस नाईक याची नियुक्ती करण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर आता पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अनिल मंदे यांचा एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या हत्या प्रकरणाबाबत कृष्णा आंधळेकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली आहे. त्याला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावे तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींनाही फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.त्यानुसार आंधळे तपास यंत्रणेला सापडणं अतिशय गरजेचं आहे.