पुणे : राज्यातील तापमानात वेगाने वाढ झाल्याने उन्हाच्या झळांची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यात आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात काही भागात कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे.त्यामुळे उन्हाचा ताप वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
राज्यात ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे.आज विदर्भातील उष्णतेची लाट कायम असून ब्रह्मपुरी पाठोपाठ चंद्रपूर,अकोला, नागपूर आणि वर्धा येथे 41 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर, धुळे, मालेगाव, यवतमाळ आणि अमरावती येथे तापमानाचा पारा 40 पार झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
त्याचबरोबर पुणे, सांगली,सातारा,सोलापूर,महाबळेश्वर,मालेगाव नाशिक, निफाड,कोल्हापूर या ठिकाणी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली आहे.