पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून चालविण्यात यावी, या संदर्भातील अर्जावर पुण्याचे विशेष न्यायालय सात एप्रिलला आदेश देणार आहे. त्यामुळे या 7 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते; त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामध्ये विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला असून, खटल्याच्या सुनावणीसाठी स्वत:ऐवजी वकिलामार्फत हजर राहण्यासाठी गांधींनी केलेला अर्जही मंजूर केला आहे. या प्रकरणी आता ७ एप्रिल रोजी आदेश होणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल ऐवजी समन्स ट्रायल ‘म्हणून चालवण्यात यावी असा अर्ज केला असून, या संदर्भात दावा दाखल करणारे सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनीही त्याला सहमती दर्शविली आहे.