पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या राजीनाम्यावर धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहेत. त्या म्हणाल्या, फार आधीच हा राजीनामा यायला हवा होता, राजीनाम्यापेक्षा त्यांनी मंत्री पदाची शपथच घ्यायला नको होती त्यामुळे हे सर्व पुढे झालं नसतं असं रोखठोक मत त्यांनी मांडलं आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करून त्यांचा जीव घेण्यात आला. या घटनेला 82 दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर आज महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा त्यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कडे आपला राजीनामा पीए द्वारा सोपवला आहे. यावर बोलताना भगिनी पंकजा मुंडे म्हणाल्या, ज्यांनी राजीनामा घेतला तो आधीच घ्यायला हवा होता. कारण देशमुख कुटुंबियांच्या दुखापुढे हा राजीनामा ही काहीच गोष्ट नाही. त्यामुळे मला वाटतं “देर आये दुरुस्त आए” असं त्या स्पष्ट म्हणाल्या.
दरम्यान पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या परिवाराची माफी मागते असं देखील म्हटलं. तसेच आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना चांगलाच वेग आला असून धनंजय मुंडे यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.