मुंबई : मागील काही महिन्यापासून मुंबईत सातत्याने मराठी भाषेचा, मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक देण्याच्या घटना घडत आहे. अशातच आता घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी- गुजराती वाद टोकाला गेला आहे.घाटकोपरच्या एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी नागरिकांना वारंवार त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मराठी माणसं घाणेरडी अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घाटकोपर येथील एका सोसायटीमध्ये बहुतांश कुटुंब ही जैन, मारवाडी आणि गुजराती आहेत. तर केवळ चार मराठी कुटुंब आहेत. या 4 मराठी कुटुंबांना इतर कुटुंबीयांकडून मांसाहारी जेवणावरून गुजराती, जैन सदस्यांकडून त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. या सोसायटीमधील शाह नावाच्या व्यक्तीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो’,असे वारंवार म्हणून त्यांचा अपमान केला जातो. या प्रकारानंतर मनसैनिकांनी सोसायटीमध्ये धडक दिली आहे.
याप्रकरणी मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी सोसायटीतील सदस्यांना इशारा दिला. या सोसायटीमध्ये चार मराठी कुटुंब आहेत. पण, त्यांना यापुढे त्रास दिला तर त्यांच्यासाठी 4000 लोक धावून येतील असेही त्यांनी म्हटले आहे.या घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेने अमराठी लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.