पुणे : अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत तब्बल दोन तास चर्चा असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र दोघांच्या भेटीमागच कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मध्यरात्रीच्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
उद्योगपती गौतम अदानी यांचे मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पासह आणखी चार प्रकल्प निर्माणधीन आहेत. त्यातच नुकताच गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना मिळाला आहे. याच पुनर्विकास प्रकल्पांसदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर रात्री 12.10 मिनिटांनी गौतम अदानी सागर बंगल्याहून निघाले. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
उद्योजक गौतम अदानी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन विरोधी पक्ष सातत्याने देवेंद्र फडणवीस सरकारला टार्गेट करत असतो. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन विरोधकांनी सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या या भेटीनंतर धारावी आणि मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.