दिल्ली : घरात प्रचंड कोट्यवधींचं घबाड सापडल्याने वादग्रस्त ठरलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची कॉलेजियमने अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली आहे. मात्र न्यायव्यवस्थेत प्रचंड खळबळ उडाली असून बदली करण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी न्यायमूर्तींची बदली नको थेट राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या घरी रोकड सापडल्याने कायदेशीर तज्ञांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या बदली ऐवजी न्यायमूर्तींचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. यावर ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी हे प्रकरण ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे सांगत न्यायाधीशांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे.
कारण न्यायाधीशाने ‘पूर्णपणे प्रामाणिक’ असणे अपेक्षित आहे आणि हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाऊ नये. अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान न्यायमूर्तींच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोकड रक्कम सापडल्याचे प्रकरण संसदेतही गाजले. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी हा मुद्दा उपस्थित करून अलाहाबाद उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालवण्यासंबंधीच्या प्रलंबित नोटिसीचाही उल्लेख केला.हेच प्रकरण एखादा राजकीय नेता, नोकरशहा किंवा उद्योगपतीशी संबंधित असते तर त्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई झाली असती, असेही त्यांनी म्हटले. न्यायमूर्तींच्या राजीनाम्यावर आता सर्व स्तरातून मागणी होत आहे.