पुणे : पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरण ताज असतानाच आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोऱ्यानीं छेडछाड काढल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला माफी देता येणार नाही, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा असते, त्या यात्रेच्या निमित्ताने रक्षा खडसे यांची मुलगी आकाश पाळण्यात बसवण्यासाठी तिच्या मैत्रिणी सोबत गेली होती. त्यावेळी काही टवाळखोरांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिच्यासोबत गार्ड आणि काम करणारी मुले होती तरीसुद्धा ही घटना घडली. या प्रकारानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिस स्टेशनला दाखल झाल्या. आणि तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू आहे. आता या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, आरोपींवर कठोर कारवाई होणारच, या प्रकरणातील आरोपींना माफी देता कामा नये, या घटनेत एका विशिष्ट राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेतअसं त्यांनी स्पष्ट सांगितलं.दरम्यान जळगाव प्रकरणातील आरोपी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट राजकीय पक्षाचे पदाधिकारी असे म्हटल्याने हे प्रकरण आणखी तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील घटनेवरून राज्यात वातावरण तापलं असताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचे प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्यांचे काय असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.