पुणे : नीट पीजी २०२४ परीक्षेत पाच पर्सेंटाईल गुण मिळविणारे विद्यार्थी देखील आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायला पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नुकतेच याबाबत एक नोटीस जारी केली असून, खुला गट, विमुक्त जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या मागास आदी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी आता अवघे ५ पर्सेटाईल गुण आवश्यक केले आहेत.
दरवर्षी खुला गट व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना ५० पसेंटाईल, तर इतर सर्व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० पर्सेंटाईल गुणांची आवश्यकता असते. याआधी देखील ४ जानेवारी २०२५ रोजी तिसऱ्या प्रवेश फेरीपूर्वी पात्रता टक्केवारी कमी करण्यात आली होती. खुल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना १५ पर्सेंटाईल, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १० पर्सेंटाईल गुण आवश्यक करण्यात आले होते. त्यानंतर आता चौथ्या फेरीनंतर हे पात्रता गुण आणखी कमी केले आहेत.