पुणे: शिक्षण हक्क कायद्यानुसार, (आरटीई) २५ टक्के राखीव जागांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दहा दिवसांचा कालावधी लोटला असून, राज्यभरात केवळ १३ हजार ६९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली. परंतु, पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून आरटीईच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहेत. अनेक पालक पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळाला नसल्याने आरटीईकडे पाठ फिरवतात. ऑनलाईन सोडत काढल्यानंतर निवड यादीत १ लाख १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तसेच प्रत्यक्ष यादीत ८५ हजार ४५७ विद्यार्थ्यांची निवड झाली. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. यंदा ८ हजार ८६३ शाळांनी आरटीईची नोंदणी केली आहे. राज्यात १ लाख ९ हजार ८७ जागांसाठी ३ लाख ५ हजार १५२ इतके अर्ज आले आहेत.
पालकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने ते निर्धारित कालावधीत प्रवेश घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, याकरिता प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.